नाशिकमध्ये तब्बल बारा वर्षांनी होणारा यंदाचा कुंभमेळा धमक्यांच्या आखाड्यामुळे चर्चेत आला आहे. महंत ग्यानदास यांच्याशी वाद झाल्यानंतर साध्वी त्रिकाल भवंता यांनी त्यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचा थेट आरोप केला होता. आता तिच री जगद्गुरू रामानुजाचार्य ऊर्फ हिमालय बाबा यांनी ओढली आहे. त्यांनी ग्यानदास यांचे थेट नाव घेतले नसले तरी आपल्याला साधू-महंत व त्यांच्या अनुयायांपासून धोका असल्याचे सांगून झेड प्लस सुरक्षेची मागणी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
पर्वणी जसजशी जवळ येत आहे, तसा साधू-महंतांमधील वाद विकोपाला जाऊन त्यांना आता एकमेकांपासून असुरक्षित वाटू लागले आहे. साधुग्राममध्ये व्हीआयपी यज्ञमंडप उभारून अखंड ज्योत उभारल्यावरून श्री श्री १००८ हिमालय पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य ऊर्फ श्री हिमालय बाबा सध्या साधू-महंतांच्या टीकेचे लक्ष बनले आहेत. महंत ग्यानदास यांनी त्यांच्या व्हीआयपी बडेजाव फाईव्हस्टार यज्ञमंडपावर टीका करताना, या ठिकाणी भाविकांची लूट होत असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यावरून हिमालय बाबा आणि साधू-महंतांमध्ये आखाडा रंगला आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या मदतीने त्यांच्याच लेटरहेडवर हिमालय बाबांनी राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांना पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. साधू-महंतांमधील वादाने सुरुवातीला काहीसे मनोरंजन झाले असले तरी आता `हाचि साधू ओळखावा का`, अशीच नाशिककरांची भावना झाली आहे.
शैव आणि वैष्णवांच्या वादाची प्रचिती नाशिककरांना ध्वजारोहण सोहळ्यातच आली होती. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या पदाबद्दलही नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील काही साधू-महंतांचा आक्षेप आहे. मायाजाल दूर ठेवण्यासाठी अलिप्तवाद शिकविणाऱ्या आधुनिक संतांनांच मायाजालाचा गराडा पडल्याचे वास्तव सिंहस्थ कुंभमेळ्यात बघायला मिळत आहे. येत्या काळात साधू-महंतांमधील वाद, आरोप-प्रत्यारोपांची धार तीव्र होण्याची संकेत मिळत आहेत.
सेना भाजपाचा वाद
महंत ग्यानदास आणि हिमालय बाबा यांच्यातील वादाला सेना-भाजपच्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. हिमालय बाबा हे शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यामुळेच ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहणाकडे पाठ फिरवत, हिमालय बाबांच्या ज्योत प्रज्ज्वलन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ग्यानदास हे भाजपशी जवळीक असलेले महंत आहेत. त्यामुळे या वादाला दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वादविवादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट