म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
पहिल्या शाही पर्वणीदरम्यान नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात आढावा बैठक बोलावली होती. यावेळी नागरिकांनी विविध अडचणी मांडल्याने पोलिस आयुक्तांनी दुसऱ्या शाही पर्वणीत बंदोबस्त शिथिल करण्याचे आश्वासन दिले.
दुसरी शाही पर्वणी तेरा सप्टेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त पहिल्या पर्वणीत झालेली गैरसोय व आलेल्या अडचणींसंदर्भात धार्मिक गुरू, नागरिक, लोकप्रतिनिधी, विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक आदींचे अनुभव जाणून घेण्यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आढावा बैठक बोलावली होती. पर्वणी काळात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची मुभा मिळावी, शहरांतर्गत वाहने फिरण्यासाठी कोणतेच प्रतिबंध नसावे, दूध बाजारात सकाळी व सायंकाळी दूध विक्रीची परवानगी असावी, गल्ली बोळात बॅरिकेडिंग लावून रस्ते बंद करण्यात येऊ नये, सिंहस्थ पास असलेल्या व्यक्तीला कोठेच अडविण्यात येऊ नये, भाविकांना अन्नदानासाठी अन्नछत्राला ठिकठिकाणी स्टॉल उभारू द्यावे, या अन्नछत्रसाठी अन्नसुरक्षा विभागाची परवानगीची अट शिथिल करावी, अशा विविध मुद्यांवर बैठक गाजली.
पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी मनोगत जाणून घेऊन दूध विक्रेत्यांना सकाळी व सायंकाळी एक तास अगोदर दूध बाजारात प्रवेश दिले जाईल, अमरधाम येथे अंत्यसंस्कारसाठी बंदोबस्ताच्या दृष्टीने विचार केल्यानंतर निर्णय घेऊ, गल्ली बोळातील बॅरिकेडिंग कमी करण्याचे प्रयत्न करू, शहरांतर्गत फिरण्यासाठी शहर बससेवा व रिक्षांचा पर्याय उपलब्ध करून देऊ, लोकप्रतिनिधी व इतर समाजसेवकांना दिलेले सिंहस्थ पास हे त्या त्या ठिकाणी ग्राह्य मानून प्रवेश दिला जाईल, पर्वणी काळात सर्व दुकाने, हॉटेल्स उघडी राहतील याचे नियोजन राहील. बाह्य पार्किंगपासून भाविकांची पायपीट कमी करण्यासाठीचे प्रयत्न राहणार असून, नाशिकरोड येथून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी व्दारका, काठेगल्ली येथपर्यंत वाहनाने येण्याची सोय केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट