नाशिक : साधुग्राममध्ये जमलेल्या लाखो भाविकांना शाही मिरवणुकीत सहभागी होता आले. भाविकांचा लोंढा एवढा प्रचंड होता की यात साधू, आखाडे आणि खालसे यांची उपस्थिती काही वेळ नगण्य ठरली. साधुग्राम, शाहीमार्ग रामकुंड याठिकाणी मिळेल त्या जागेवर भाविक रात्रभर थांबले. सकाळी शाही मिरवणूक गौरी पटागंणावर आली असता शेकडोंच्या संख्येने भाविक यात सहभागी झाले. भाविकांच्या प्रचंड गर्दीत काही हजार साधू हरवल्याचे दिसून आले.
पहिल्या शाही मिरवणुकीत साधूंची उपस्थिती फारच कमी होती. त्यामुळे साधुग्रामवर झालेला खर्च आणि त्या अनुषंगाने उदभवणारे अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्या पर्वणीदरम्यान साधूंची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या पर्वणीप्रमाणे यावेळेस सुद्धा अंदाजे ४० ते ५० हजार साधू महंतांनी हजेरी लावली. नाशिकचे कुंभमेळ्यात साधूंची संख्या घटण्याचे नेमके कारण मात्र मिळू शकलेले नाही. तिसऱ्या पर्वणीला साधूंची संख्या यापेक्षा कमी होऊ शकते.
दरम्यान, शनिवारी सकाळपासून साधुग्रामसह, रामकुंड, गौरी पटांगण, शाहीमार्ग आदी ठिकाणी भाविकांची रीघ लागली होती. शनिवारी रात्री सुमारे ४ ते ५ लाख भाविक या परिसरात बसले होते. रात्री दोन वाजेपर्यंत भाविक रामकुंडावर तळ ठोकून होते. मात्र, यानंतर पोलिस प्रशासाने भाविकांना रामकुंडासह गौरी पटांगणावरून बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुसंख्य भाविकांनी मग गणेशवाडी भाजी बाजारात आसरा घेतला. साधुग्राममधून आलेले भाविक मात्र मिरवणुकीसोबत थेट रामकुंडापर्यंत पोहचले.
प्रेशर पॉईंट ठरला त्रासदायक
साधुग्राममधून येणारे लाखो भाविक शाहीमार्गाने किंवा नवीन शाहीमार्गाने गौरी पटागंणावर पोहचत होते. या भाविकांना पोलिस शाही मार्गावरून गौरी पटागंणावर काढत होते. मात्र, सकाळी ८ वाजेच्या सुमारास श्री पंच मोही निर्मोही आखाड्याची मिरवणूक येथे पोहोचल्याबरोबर एकच धांदल उडाली. साधूबरोबर मोठ्या संख्येनी भाविक सुद्धा शाहीमार्गावर घुसू लागले. या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतके पोलिस असल्याने गर्दी आवरणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे शाही मिरवणुकीत साधूपेक्षा भाविकांची संख्या मोठी झाली. दुसऱ्या शाही मिरवणुकीचा सोहळा भाविकांना पहाता यावा यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात बदल केला होता. त्याचा चांगला परिणाम यावेळेस जाणवला. रामकुंड ते गौरी पटागंण या भागात रस्त्याच्याकडेला भाविक बसले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट