शहराच्या मैल्याचा ताण उंटवाडी, मोरवाडी, भुजबळ फार्म येथील मलःनिसारण प्रकल्प बंद करून त्यांचा मैला टाकळी येथील प्रकल्पात सोडला जात आहे. सातपूरपासूनचा मैला येथे जमा होतो. त्यामुळे ताण वाढला आहे. मैल्यावर प्रक्रिया करून तो नदीत सोडला जातो. क्लोरिनेशनच्या एक, क्लॅरिफायरच्या दोन आणि प्युरिएशनच्या दोन प्लॅन्टद्वारा मैल्यावर प्रक्रिया केली जाते. खराब पाणी नदीत सोडले जाते तर राहिलेला मैला अन्यत्र हलविला जातो.
असह्य उग्र दर्प स्वच्छ हवा मिळावी म्हणून नागरिक या निसर्गरम्य रस्त्याने सायंकाळी फिरण्यासाठी जातात. परिसरात लोकवस्ती आहे. मलःनिसारण प्रकल्पातील विषारी वायू हवेत फैलावल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. जेलरोडपर्यंत हा उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांना वाचवा : ढगे नगरसेवक शैलेश ढगे 'मटा'शी बोलतांना सांगितले, की महासभा आणि स्थायी समितीत हा प्रश्न उपस्थित केला. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आर. के. पवार (अधीक्षक अभियंता मलनि:सारण केंद्रप्रमुख) आणि अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांची बैठक घेतली. प्रकल्पाचा ठेकेदार दोषी आढळला तर त्याला ब्लॅकलिस्ट करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.
प्रयत्न सुरू : पवार अधीक्षक अभियंता (प्रकल्प) यू. बी. पवार म्हणाले, की मलःनिसारण प्रकल्पातून थंडीच्या दिवसात उग्र वास जास्त येतो. तक्रारी आल्यानंतर आम्ही रात्री व दिवसा या परिसरात फिरलो. नागरिकांकडे चौकशी केली. तेव्हा हिवाळ्यात रात्री जास्त त्रास होतो असे समजले. महापालिका यावर तातडीने उपाययोजना करत आहे. तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट