तडीपार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखिल विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या हत्याकांडामागे संशयांचे धुके अद्याप कायम असून, बाहेरगावावरून परतलेले पोलिस अधीक्षक संजय मोहिते, काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किरकोळ वादातून सराईत गुन्हेगार आव्हाड आणि गवळीची ३१ डिसेंबररोजी हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाची वाच्यता झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पीएल ग्रुपच्या सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर आणि निखिल मधुकर यांना अटक केली. या संशयितांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी पोलिसांनी प्रिन्स चित्रसेन सिंग आणि वतन शिवाजी पवार या दोघा संशयितांना पाथर्डी फाटा परिसरातून अटक केली. ते मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफिने अटक केली. सोमवारी नाशिक कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यासाठी पोलिसांकडून संशयितांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.
मूळ मुद्द्याला बगल
३१ डिसेंबररोजी शहर आणि ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. या दिवशी शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आल्याचा दावा शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून करण्यात येत आहे. मग, कारमधील हे दोन मृतदेह पोलिसांच्या नजरेस कसे काय पडले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच छोटे मोठे गुंड तयार होत असून, त्यातून एकमेकांचा जीव घेण्याची स्पर्धा लागली आहे. शहर पोलिस ग्रामीणकडे तर ग्रामीण पोलिस शहर पोलिस दलाकडे बोट दाखवत काहीतरी लपावाछपवी करीत असल्याचा दावा खुद्द पोलिसांकडून केला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट