Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘फेरीवाला धोरण अंमलात आणा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अतिक्रमण हटवण्याच्या नादात शहरातील होकर्सवर देखील कारवाई होत असून, हे अन्यायकारक आहे. मनपा प्रशासनाला केंद्र व राज्य शासनाने फेरीवाला धोरणाची निश्चिती करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले असताना शहरात अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मनपाने लवकरात लवकर फेरीवाला धोरणाची अंमलबाजवणी करावी, अशी मागणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत साई एकता होकर्स युनियनचे सरचिटणीस दिनेश ठाकरे यांनी केली.

मालेगाव शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबाजवणी सुरू आहे. अतिक्रमण धारकांवर कारवाई करताना मनपाकडून फेरीवाल्यावर देखील कारवाई होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले की, तत्कालीन मनपा आयुक्त लतिश देशमुख यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर फेरीवाला समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर या समितीची एकही बैठक होऊ शकली नाही. समितीच्या माध्यमातून अशी बैठक व्हावी आणि फेरीवाला धोरण निश्चित व्हावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरवा करीत आहोत. तेव्हा मनपा प्रशासनाने तत्काळ शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करावे, त्यांची नोंदणी करून ओळखपत्र द्यावे. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाने सरसकट फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबावी. अतिक्रमण हटाव मोहिमेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यामुळे फेरीवाल्यांवर अन्याय होऊ नये, फेरीवल्यासाठी हॉकर्स झोन, झेब्रा पट्टे व जागा निश्चिती झाली पाहिजे.

फेरीवाल्यांना हटवून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होऊ शकतो याचा विचार मनपा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रसंगी अध्यक्ष सुधाकर जोशी, रामा देवरे, देवा पाटील, जगदीश गोऱ्हे, आसिफ तांबोळी, राजेंद्र पाटील, देवा माळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात १०० अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत शहरातील नवीन बसस्थानक ते द्याने गाव दरम्यान असलेले कुसुंबा रोडववरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यात पाच गाळ्यांचे बेकायदेशीर व्यापारी संकुल देखील जमीनदोस्त करण्यात आले.

शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत मंगळवारी व बुधवारी प्रभाग क्रमांक दोनच्या अंतर्गत नवीन बसस्थानक ते द्याने या परिसरातील कुसुंबा रोडवरील सुमारे १०० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. शहरातील जुना आग्रा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून तसेच, धुळ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या कुसुंबा रोड पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता.

या रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर मनपाने बुलडोजर चालवला. मंगळवारी यास प्रारंभ करण्यात आला. यात बसस्थानकापासून द्याने गावाच्या दिशेने रस्त्यांच्या दोन्ही बाजूस असलेले टपरी, दुकाने, गाळे यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. यात ज्योती टॉकीजजवळील पाच गाळ्यांचे बेकायदेशीर व्यापारी संकुल देखील जमीनदोस्त करण्यात आले. तसेच, सम्राट सिनेमागृह ते द्याने गाव दरम्यान असलेले अतिक्रमण हटवण्यात आले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. गेल्या दोन दिवसात या भागातील १०० हून अतिक्रमण हटवण्यात आल्याने कुसुंबा रोड मोकळा झाला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका जागेसाठी चौदा इच्छुकांचे अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुका संचालक पदासाठी कमालीची चुरस लागली आहे. इगतपुरी तालुक्यातून संचालक पदासाठी एका जागेसाठी चौदा इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, सभासदांच्या मनधरणीसाठी व आपली वर्णी लागावी यासाठी गुप्त बैठकांना वेग आला आहे. ही निवडणूक चुरशीची होणार की एकमेव जागा बिनविरोध होणार हे माघारीनंतर स्पष्ट होईल.

मजूर फेडरेशनच्या इगतपुरी तालुका संचालकपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तालुका संचालक पदासाठी लॉबिंग, शह-काटशह, इच्छुकांकडून भेटीगाठी व मतदारांसाठी चहापाणी आधी कार्यक्रम जोरात सुरू आहेत. या तालुकापदासाठी दोन ते तीन गट सक्रिय असून, आपली वर्णी कशी लागेल, आपल्या समर्थकाला संधी कशी मिळेल, आपल्या गटाचा विजय कसा होईल यासाठी सर्व इच्छुक व मतदार सक्रिय झाले आहेत.

एकूण ५२ मतदार तथा सदस्य संख्या असलेल्या या तालुक्यात संचालक पदासाठी बाजार समितीचे माजी संचालक व सक्षम दावेदार अरुण पोरजे, माजी सभापती संपत काळे, विद्यमान संचालक अरुण गायकर, घोटी संघाचे संचालक भाऊराव जाधव, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, घोटी बाजार समिती संचालक साहेबराव जाधव, उत्तम मांडे, पंढरीनाथ बर्हे, जगन वाजे, राजू शिंदे, माजी सभापती रामदास चव्हाण, साहेबराव धोंगडे, अशोक रोकडे या उमेदवारांमध्ये इच्छुकांमध्ये अंतिम क्षणी कोणाची उमेदवारी कायम राहाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेल गीतांची घडली सफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेरे मेरे मिलन के ये रैना, रिमझिम गिरे सावन, ये चांदसा रोशन चेहरा, गुण गुणा रहें है भवरे खिल रहीं है कली कली, क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो, या १९७० ते ८० या दशकातील गीतांच्या सादरीकरणानी रसिकवर्गाला या काळाची सफर घडली.

निमित्त होते, सुहाना सफर प्रस्तूत यादे, रफी, मुकेश, किशोर की, या सुरेल कार्यक्रमाचे. कालिदास कलामंदिरात बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील सुहाना सफर ऑर्केस्ट्रा ग्रुपतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून गौरवलेल्या १९७० ते १९८० या दशकातील मुकेश, रफी, किशोर यांची गाणी त्यांनी यावेळी सादर केली. 'व्हॉईस ऑफ मुकेश' हा सन्मान मिळवलेल्या पपीशकुमार लालगुणकर यांच्या सोबत प्रवीणकुमार डोंगरे, संजय पाटणकर, धनंजय कदम, अश्विनी वझे यांनी सादर केलेल्या गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. याबरोबरच त्यांनी पन्ना की तमन्ना है की, भंवरे की गुंजन, धीरे धीरे बोल कोई, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले बने, जिया हो जिया कुछ तो बोल दो, अॅन इव्हिनिंग इन पॅरिस, डमडम डिगा डिगा, इशारो इशारो मे आदी सत्तर गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्याविरुध्द गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील प्रभाग एकमधील अधिकारी पंकज सोनवणे यांच्या शासकीय कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून छावणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील राजेंद्र सूर्यवंशी यांच्या बांधकाम संदर्भातील तक्रारीची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या प्रकरणातील वादातून येथील मनपा प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे यांच्या कार्यालयात दि. ९ जानेवारी रोजी राजेंद्र सूर्यवंशी यांनी येऊन वाद घातला. तसेच, त्यांना शिवीगाळ देखील केली, अशी तक्रार सोनवणे यांनी छावणी पोलिस स्थानकात दिली आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला व अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खेडेकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांवरील अन्याय दुर्लक्षित

$
0
0

श्रीधर देशपांडे

कामगार म्हटला की डोळ्यापुढे येतो तो औद्योगिक, फॅक्टरी कामगार. मात्र, देशामध्ये अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये जसे ज्यूट, कोळसा खाण कामगार संपत्ती निर्माण करतात. अशाच उद्योगांपैकी साखर कारखाना होय. तेथे ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांची संख्या आहे २५ लाख. राज्यातील २५ टक्के ग्रामीण जनता या उद्योगाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निगडीत आहे. गळीत हंगामाच्या वेळी ऊस तोडणी वाहतूक कमागारांची संख्या आहे दहा लाख. देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी महाराष्ट्रात उत्पादन होते ४० टक्के.

असे चांगले चित्र असतांना जे कामगार हे एवढे मोठे उत्पादन करतात त्यांची परिस्थिती सुधारणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने चित्र उलट आहे. बहुजनांच्या हितासाठी सहकार तत्त्वामधून या उद्योगाची निर्मिती झाली. तरी सुद्धा! ऊस तोडणी कामगार हे दलित, मागासवर्गीय, ग्रामीण भागातील शेतमजूर वा भूमिहीन आहेत. म्हणून त्यांचे कल्याण करून जीवनच बदलून टाकणे आवश्यक होते. ते कामही प्रचंड करतात. तेही रात्री अपरात्री थंडीत-उन्हातान्हात शिवाय अंगावर अपघाती जोखीम घेऊन. मोबदला म्हणून त्यांच्या राहणीमानाची प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? आपले गाव सोडून ते उद्योगाचे ठिकाणी येतात. त्यांच्या मुला-बाळांची शिक्षणाची तेथे नीट सोय नसल्यामुळे प्रचंड नुकसान होते. कारखाना परिसरात औषधोपचाराची सुविधा म्हणून नाही. पिण्याचे पाणी राहण्याचे ठिकाणाबाबत हाल आहेत. अशाही परिस्थितीत काही आर्थिक फायदा होत असेल तर ठीक. पण तोही नाही. २०११ साली ऊस तोडणीचे वाढीव दर प्रतिटन १३७.५८ पैसे. पण त्याचवेळी इतर राज्यात जसे गुजरात, कर्नाटकमध्ये ते दर होते रुपये २०० ते २५० पर्यंत होते. इतर राज्यातील ऊस तोडणी कामगारांहून खूप कमी उत्पन्न आहे. याचा अर्थ कारखाना चालवणाऱ्या बोर्डाला हे इतर राज्यातील बोर्डापेक्षा अधिक नफा मिळतो. इतर लाभ पीएफ सामाजिक सुरक्षा, अपघाती विमा असे मूलगामी लाभ हे सोडूनच द्या; पण पूर्वी वेतनकरार जे तीन वर्षाचे होते तो २०१४-१५ मध्ये पाच वर्षांसाठी झाले. कल्याणकारी महामंडळ नेमा ही कामगार संघटनांची आंदोलनातून केलेली जुनी मागणी २०१५ मध्ये मान्य झाली. पण अंमलात आणण्याऐवजी पुन्हा लवाद लादण्यात आला. अंतरिम वाढ फक्त २० टक्केच झाली. मजुराची, मुकादमाची प्रतिटन फरकाची रक्कम लवादाने रद्द केली. सन २०१४-१५ चा फरक बुडविला अशा तेथे तक्रारी सुरू आहेत. थोडक्यात १०-१२ तास काम करूनही महिला कामगारांना मिळतात महिन्याला साधारण साडे चार हजार रुपये तर पुरुषांना सहा हजार. किमान वेतनाची ऐशीतैशी!

प्रश्न असा आहे की, कामगारांचे हे पैसे कोठे गेलेत? आता ज्यांना साखरसम्राट म्हणून ओळखले जाते किंवा म्हटले जाते त्यांच्याच खिशात! हाच त्याचा अर्थ निघू शकतो. कामगारांची परिस्थिती हालअपेष्टा दिवसेंदिवस खराब होत आहे. सुरुवातीचा चांगला काळ केव्हाच संपलेला आहे.

आपली परिस्थिती बदलायची असेल तर संघर्ष, आंदोलनाला पर्याय नाही. त्याशिवाय कोणता धडा हे कामगार शिकणार? शिवाय कामगारांची भक्कम व व्यापक एकजूट हाच धडा. संघटनांसाठी सुद्धा. यंत्रमाग कामगारांची स्टोरी अजिबात निराळी नाही. भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर इत्यादी ठिकाणी यंत्रमाग केंद्र आहेत. १०-१२ लाख कामगार काम करतात. फारच कठीण परिस्थिती आहे. प्रत्येकाला १२ तास, ४ ते १२ यंत्रमागावर काम करावे लागते. बऱ्याच ठिकाणी अंगावर घेऊन काम करावे लागते. कारखान्यात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह नाही. त्यांना सुट्ट्या, कायदेशीर पे स्लीप, हजेरी कार्ड, सुरक्षितता नाही. किमान वेतन अर्थातच नाही! मालक उलट मागणी करताहेत की, किमान वेतन कायदा रद्द करा वा फेररचना करा. सन १९८६ साली किमान वेतन जाहीर झाले. पण सन २०१३ मध्ये इचलकरंजीच्या ४० दिवसांच्या बेमुदत संपानंतर नोटीफिकेशन निघाले. हायकोर्टाच्या आदेशानंतर २०१५ मध्ये किमान वेतनाची सुधारित अधिसूचना निघाली. सर्व ठिकाणी जोरदार आंदोलने होत असूनही मालक विविध सुविधा व किमान वेतन देण्यास तयार नाही. सरकारही गंभीर नाही व उदासीन आहे. सन १९८६ पासूनच्या धंद्याची लक्षणीय वाढीनंतर मालक अधिकाधिक श्रीमंत होत आहे तरी सुद्धा नफ्यातील कामगारांचा रास्त हिस्सा द्यावयास मालक तयार नाहीत. संघर्षाला काही पर्याय आहे का?

बिडी उद्योगाची याहूनही भीषण परिस्थिती आहे. या कामगारांना पिवळे रेशनकार्ड द्या ही मागणीच त्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते. त्यांना ना सुविधा ना कोठला कायदा! किमान वेतन नाहीच. घरातले इतरही बिड्या वळतात. त्यांना दमा, ब्राँकायटीस, टीबी यासारख्या आजारांनी घेरलेले आहे. इतर कायदेशीर सर्वांसारख्या सोयीसुविधा विविध लाभ तर मिळत नाही पण या आजाराचा संभाव्य धोक्यासाठी औषधोपचाराची पण सोय नाही. १००० हजार बिड्यांमागे १४० रुपये मिळतात. मागणी २८० ची आहे. महागाईचा विचार होणे अत्यावशक आहे. कामगारांना दररोज १०० ते १५० रुपये मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक बाब म्हणजे सोलापूरमध्ये अडम मास्तरांनी दहा हजार घरांची यशस्वी योजना पुरी केली. सरकारने गंभीरतापूर्वक सर्व बिडी कामगारांसाठी चांगल्या राहणीमानासाठी पावले उचलावयास पाहिजेत. आंदोलनाला प्रतिसाद म्हणून नव्याने जाहीर झालेले हजार बिड्यांमागे २१० रुपये लागू करा, अशी मागणी कायदेशीर सुविधांसह मान्य करणे अगत्याचे आहे.

राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन घटना निर्मितीच्या वेळी म्हणाले होते, सतत दारिद्र्यात पिचलेल्या, काम मिळण्यासाठी वणवण हिंडणाऱ्या लोकांना घटनेबद्दल अभिमान वाटू शकत नाही. कल्याणकारी देशात या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाने‌ दिली ग्रामविकासाला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वंचित घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणतानाच राज्यातील ग्रामविकासातही मुक्त विद्यापीठाचे योगदान मोलाचे आहे. विद्यापीठाचे कार्य खऱ्या अर्थाने विकास प्रक्रियेशी जोडले गेले आहे, असे गौरवोद्गार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंग यांनी काढले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मुक्त कृषि शिक्षण कार्यशाळेत विद्यापीठाचा गौरव करण्यात आला. मुक्त विद्यापीठाच्या वतीने कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी पुरस्कार स्वीकारला. डॉ. पंजाब सिंग म्हणाले, की विकास प्रक्रियेत शिक्षणाच्या माध्यमातूनच देशाचे महासत्ता बनण्याचे स्वप्न साकारता येईल. त्यासाठी दूरशिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याची गरज आहे. मुक्त विद्यापीठाने १९९० पासून मुक्त कृषी शिक्षणास सुरुवात करून मागील २६ वर्षांमध्ये २ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत कृषी शिक्षण पोहोचविण्याचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. मुक्त विद्यापीठाकडून कृषी पदवी अथवा पदविका पूर्ण केलेल्या जवळपास २० हजार विद्यार्थ्यांची राज्यातील ग्रामसेवक, कृषिसेवक, तलाठी, वन अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी रोपवाटिका, बीजोत्पादन, जैविक खत उत्पादन आदी कृषी उद्योग सुरू केले आहेत. सुमारे १ लाख ५० हजारांहून अधिक विद्यार्थी कृषीशिक्षण घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.

महाराष्ट्रातील कृषी उद्योग व्यावसायिकांसाठी मुक्त विद्यापीठात लवकरच कृषी तंत्रज्ञान संवर्धन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली येथील कार्यशाळेत 'मुक्त कृषी शिक्षणाची चळवळ' या विषयावर संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी केलेल्या सादरीकरणाची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एन. एस. राठोड यांनी दखल घेतली. आगामी काळात भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारतातील सर्व मुक्त विद्यापीठांबरोबर एक करार करून परिषदेंतर्गत कार्यरत कृषि संशोधन संस्था आणि कृषि विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी कॉलेजेसमार्फत मुक्त कृषी शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास राष्ट्रीय कृषी कौशल्य शिक्षण परिषदेचे प्रमुख डॉ. मंज्युद आलम, बेंगलोर कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. जी. चेंगाप्पा, अमिटी विद्यापीठाचे संचालक डॉ. बलजितसिंग हंसरा, केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. विनय मेहरोत्रा आदी उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारीच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंगमध्ये यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी येथील डीकेथलॉन स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या ज्युनियर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग २०१६ स्पर्धेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

७ वर्षांखालील वयोगटात बीगिनर्स श्रेणीत प्रज्ञेश भडके (इयत्ता पहिली) याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळविले तर अभय बोरसे(इयत्ता पहिली) याने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळविले. तसेच इनलाइन बीगिनर्स या श्रेणीत विदीत घुगे (इयत्ता दुसरी) याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळविले. नाशिकमधील ७ वर्षांखालील वयोगटात एकूण ३५ खेळाडू सहभागी झाले होते. तर ४ ते ८ वर्षांखालील वयोगटातून एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भव्य सोहळ्यासाठी मांगीतुंगी सज्ज; चोख बंदोबस्त

$
0
0

कैलास येवला, सटाणा

जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर होणाऱ्या १०८ फुटी श्री भगवान वृषभदेवाच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक पंचकल्याण मंगल सोहळ्यास आज, गुरुवारी शुभारंभ होत आहे. राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. तब्बल एक आठवडाभर सुरू असणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी श्री क्षेत्र मांगीतुंगी परिसर नटला असून, देश-विदेशातून सुमारे १५ लाख भाविक या ठिकाणी येत असल्याने देवस्थानासह प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

राज्य शासनाने मिनी महाकुंभ म्हणून या सोहळ्याची दखल घेत सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ज्ञानमतीमाता यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मांगीतुंगी शिखराच्या मांगीगिरीवर आशिया खंडात सर्वात उंच ठरणाऱ्या या विशालकाय मूर्तीच्या कामास सन २००२ साली प्रारंभ करण्यात आला होता. चंदनामती माता, हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामीजी, डॉ. पन्नालाल पापडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मूर्ती निर्माण समितीची स्थापना करण्यात आली होती. चौदा वर्षांच्या तपश्चर्येनंतर या विशालकाय मूर्तीचे काम पूर्णत्वास गेले आहे.

भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याला आज दि. ११ रोजी ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मांगीतुंगीकडे पाहिले जात आहे. मूर्तीच्या पंचकल्याण व महामस्ताभिषेक सोहळ्यास शासकीय सोहळा म्हणून गौरविले गेल्याने केंद्र व राज्य शासनाने परिसर विकासासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देऊन परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. जैन धर्मिय आचार्य, मुनी, आर्यिका, माताजीबरोबर भाविकांचे आगमन या ठिकाणी होऊ लागले आहे.

आरोग्य विभाग, पोलिस विभागाने चोख व्यवस्था केली आहे. एसटी महामंडळानेही दीडशे जादा बसेसेची व्यवस्था केली आहे. यासाठी जड वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. प्रशासनाने या सोहळ्यासाठी कुठलीच कसर ठेवलेली नाही. या सोहळ्याला मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सर्वतोभद्र महल

मांगीतुंगी पर्वताच्या पायथ्याशी धार्मिक विधीकरिता सुमारे पंचवीस हजारांहून अधिक भाविक एकाच वेळी बसू शकतील यासाठी एक लाख चौरस फुटाचा भव्य सर्वतोभद्र महल उभारण्यात आला आहे. या महलात पंखे, विजेचे दिवे, लखलखू लागले आहेत. प्रवचन व मंत्र घोषासाठी शंभर फूट रूंद व तीस फूट लांब आकाराचे चौकोनी मचाण तयार करण्यात आले. या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या ध्वजारोहणानंतर सर्वतोभद्र महलचे शुद्धीकरण करण्यात येऊन मंगलकलश स्थापना, अखंडदीप प्रजलन, सकलीकरण, यगदीक्षा, मंडप प्रतिष्ठा, याग मंडल विधान प्रारंभ करण्यात येणार आहे.

सहा ठिकाणी भोजन व्यवस्था

जैन भाविकांसह सर्व धर्मिय भक्तगणांसाठी एकत्रित सहा ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यागी, अतिमुख्य अतिथी, आचार्य, मुनी या करिता विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

४० प्रकारची नृत्ये

या सोहळ्याची जागतिक शोभा वाढविण्यासाठी देशभरातून सुमारे ५०० जैन कलाकार विविध धार्मिक नृत्ये, समाजप्रबोधनपर नाटके सादर करणार आहेत. त्यात ४० प्रकारची नृत्ये आणि १७ नाटकांचा समावेश आहे. ढोल ताशा व लेझीमचे पथक दाखल झाले असल्याची माहिती कोरिओग्राफ सौरभ अजमेरा यांनी दिली.

पायथ्याशी यात्रोत्सव

या महोत्सव कालावधीत येणाऱ्या भाविक, यात्रेकरूचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पायथ्याच्या पाच एकर जागवेर यात्रोत्सव थाटण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळण्या, दुकाने, मौत का कुंआ, ब्रेक डान्स, मिनी रेल्वे, जहाज दाखल झाले आहेत.

पायऱ्यांचे काम अपूर्णच

मांगीतुंगी या वृषभगिरी पर्वतावर साकारलेल्या १०८ फुटी वृषभ भगवान मूर्तीपर्यंत जाण्यासाठी अद्यापही पायऱ्या नाहीत. डोंगराच्या मध्यभागापर्यंत देवस्थानचीच परवाना असलेली वाहने जात असून, पुढे पायी जाण्यासाठी पक्या पायऱ्यांचे बांधकाम अद्यापही करण्यात आलेले नाही. केवळ एका पाठोपाठ एक व्यक्तीची रांग जाऊ शकेल. प्रस्तावित लिप्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते पूर्ण न झाल्यास भाविकांचा भ्रमनिरास होईल. भाविकांनी दर्शनासाठी वरती जाण्याचा अट्टहास केल्यास गोधंळ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भाविकांच्या सुरक्षेवर भर

मांगीतुंगी येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी विविध विभाग सज्ज झाले आहेत. आरोग्य, पोलिस विभागाने जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

आरोग्य सेवाही सज्ज

आरोग्य विभागाच्या वतीने दहा पथक तयार करण्यात आले असून, दोन फिरते पथक तर दोन शीघ्र कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. सहा वैद्यकीय अधिकारी, पाच बेड्सचे अतिदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी २० रुग्णवाहिका १०८ क्रमांकाच्या तैनात करण्यात आल्या आहेत. चोवीस तासांची अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिली आहे.

चोवीस तास पाणी

पाणीटंचाईची भीषणता जाणवू नये यासाठी हरणबारी धरणातून विशेष नळपाणीपुरवठा योजना चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. राज्य महामार्गावरील मांगीतुंगी फाट्यापासून, तर थेट देवस्थान या नऊ कि.मी अंतरापर्यंत जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्त्याच्या दोन्ही कडेला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

तीन हेलिपॅड

देश विदेशातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची उतरण्याची सोय करण्यासाठी या ठिकाणीती न हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.

सुरक्षा व्यवस्था

अग्निशामक विभागाच्या वतीने नाशिक, धुळे, मालेगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. दंगा नियत्रंण पथकासह राज्यभरातील सहा बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने सुमारे एक हजारांहून अधिक पुरूष व महिला पोलिस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. येथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांच्या व बॉम्बशोधक पथकाने बारकाईने पहाणी केली आहे. तसेच, राज्य महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. या सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी तब्बल ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

वाहतूक मार्गांत बदल

विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्ग क्रमांक सातवर येत असलेल्या मांगीतुंगी येथे या काळात भाविकांची उपस्थिती लक्षात घेता दोन्ही बाजूंनी राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १० फेब्रुवारीपासून दुपारी १२ वाजेनंतर ही अधिसूचना लागू असणार आहे. ती १८ पर्यंत लागू राहणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार मशीन जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेलरोड परिसरातील नेटवर्क पिपल्स सर्व्हिसेस येथे खासगी मशीनद्वारे आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या केंद्रावर आधार नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये घेतले जात असल्याने आधार मशीन जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून आधार कार्ड मोफत मिळणे आवश्यक असताना त्यासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मुंडावरे यांनी ई-डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर चेतन सोनजे यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. सोनजे यांनी विशाल गडलिंग यांच्या या संबंधित केंद्रावर जाऊन तक्रारीची शहानिशा केली. तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास येताच मुंडावरे यांना कळविण्यात आले. त्यांनी आधार नोंदणी संदर्भातील मार्गदर्शक सुचनांनुसार संचालक, माहिती व तंत्रज्ञान यांच्या कार्यालयात याबाबत माहिती दिली. संबंधित मशीन जप्त करण्यात आल्याची माहिती मुंडावरे यांनी दिली आहे. आधार नोंदणीसाठी पैशांची मागणी केली जात असल्यास तात्काळ तक्रार करावी असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील उद्योजकांच्या पदरी निराशाच

$
0
0

वीजदरप्रश्न; मराठवाडा अन् विदर्भाला झुकते माप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत पिढ्यान पिढ्या उपेक्षित राहिलेल्या मराठवाडा अन् विदर्भाला मुख्य प्रवाहात आणण्याची स्पष्ट भूमिका मांडत राज्य सरकारने या विभागांवर वीजदरप्रश्नी मेहेरनजर राखण्याचे संकेत दिले आहे. ऊर्जामंत्र्यांकडील बुधवारच्या बैठकीत वीजदरप्रश्नी उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली जाण्याचे चित्र स्पष्ट होते आहे. परिणामी नाशिकमधील उद्योगांना बाहेरची वाट दाखविण्याचाच घाट प्रत्यक्षात उतरत असल्याची निराशाजनक भावना उद्योजकांमध्ये आहे.

औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांची भेट घेत राज्यात समान वीजदर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ठरल्याप्रमाणे मराठवाडा अन् विदर्भाचेच भले करण्याचे संकेत दिल्याने उर्वरित महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये असंतोषाची लाट आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये निमा (नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन) च्या नेतृत्वाखाली राज्यभरातील उद्योग संघटनांची मोट बांधण्यात आली आहे. या बैठकीत ठरल्यानुसार सरकारने वीज नियामक आयोगाकडे सरकारने दिलेल्या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत उद्योगांसाठी देण्यात येणारी वीज ही अगोदरच जास्त दराने देण्यात येते. त्यात भरीस भर म्हणून राज्यात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या विभागांना इतर विभागांच्या तुलनेत सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याच्या सरकारच्या निर्णयास उर्वरित राज्यातील औद्योगिक संघटनांचा विरोध आहे. वीजदराच्या बाबतीत भेद केल्यास उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या स्टील व प्लास्टीक मोल्डींग उद्योगावर या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास सुमारे २५ हजार कामगाराचा रोजगार धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. राज्याचा औद्योगिक समतोल राखण्यासाठी वीजदर समानच हवेत, या भूमिकेवर उद्योजक ठाम आहेत. आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप व आमदार अपूर्व हिरे यांसह उद्योजकांच्या शिष्टमंडळात निमाचे मंगेश पाटणकर, मिलींद राजपूत, उद्योजक आशिष नहार, सुरेंद्र मिश्रा, दीपक नागरगोजे यांचा समावेश होता.

उद्योजक भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री अन् ऊर्जामंत्र्यांनी मराठवाडा व विदर्भावर वीजदरात मेहेरनजर ठेवण्याचे संकेत दिल्यानंतरही उद्योजक त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या या निर्णयाला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याची भूमिका उद्योगवर्तुळातून व्यक्त होते आहे. आज याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. उद्या (दि. १२) स्थानिक आमदार व खासदारांसमवेत बैठक आयोजित करण्यात येईल. दि. १३ फेबुवारी रोजी सर्व औद्योगिक संघटनांचे शिष्टमंडळ लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांचीही पुन्हा भेट घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दिवसात २७ लाख वसूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी शहरातील सहा विभागात जप्तीची कारवाई करण्यात आली. बुधवारी विविध कर विभागाने बड्या २८ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली असून, या कारवाईतून २६ लाख ५७ हजार रुपयांची वसुली केली आहे. तर आठ जंगम मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

चिंतामणी कन्स्ट्रक्शन, झुलेलाल पतसंस्था, रचना ट्रस्ट, दिलीप पाठक, राज डेव्हलपर्स, मनोज किसनानी या बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. पालिकेच्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च अखेरपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेने सोमवारी सातपूर प्रभागात जप्ती मोहीम राबवून ११ लाखांची वसुली केली होती. त्याच धर्तीवर आता जप्ती मोहीम शहरभर लागू केली असून, बुधवारी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, निरीक्षक मनोज संगमनेरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सहा विभागातील २८ बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. सहा विभागात २८ मिळकतींवर बुधवारी जप्ती वॉरन्ट बजावण्यात आले. त्यापैकी २० मिळकतधारकांनी मालमत्ता जप्तीची कारवाई टाळत थकबाकी जमा केली आहे. त्यामुळे एकाच दिवशी २६ लाख ५७ हजारांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तर आठ जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. थकबाकीदारांमध्ये चिंतामणी कन्स्ट्रक्शन, झुलेलाल पतसंस्था, रचना ट्रस्ट, दिलीप पाठक, राज डेव्हलपर्स, मनोज किसनानी, भीमराव हरि साळवे, बाळकृष्ण राजाराम गायकवाड या बड्या थकबाकीदारांचा समावेश आहे.

महापालिकेची कारवाई

विभागाचे नाव मिळकत संख्या जप्त मिळकत संख्या वसूल केलेली रक्कम

नाशिकरोड ०६ ०२ पाच लाख ७८ हजार २१२

पंचवटी ०२ ०० एक लाख ६७ हजार ७०१

नाशिक पश्चिम ०२ ०२ ०००

नवीन नाशिक ०३ ०० दोन लाख ६० हजार २७१

सातपूर ०६ ०२ ६ लाख ११ हजार २२६

नाशिक पूर्व ०९ ०२ १० लाख ३९ हजार ६३८

एकूण २८ ०८ २६ लाख ५७ हजार ०९२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेयच्या सर्व शाखा राहणार बंद

$
0
0

कंपनी व्यवस्थापनाला प्रतीक्षा कोर्टाच्या निर्णयाची म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय कंपनीचे वसई येथील मुख्यालय पोलिसांनी सील केल्याने कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कोर्टाचे आदेश मिळेपर्यंत मैत्रेयच्या सर्व शाखा बंद ठेवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. गुंतवणूकदारांनी संयम ठेवून सहकार्य केले तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मैत्रेय कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सत्पाळकर यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. सत्पाळकर गजाआड झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आपले पैसे मिळणार की नाही अशा विवंचनेत गुंतवणूकदार आहेत. त्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यताही बळावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापनाकडूनही गुंतवणूकदारांना संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या तपास प्रक्रियेत कंपनीच्या वसई येथील मुख्य कार्यालयातील सर्व्हर ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच वसई येथील मुख्यालयाला सील केल्याने तेथील दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. कंपनीने केलेल्या आर्थिक गुंतवणूकीवर मंदीमुळे परतावा मिळण्यास उशीर होत आहे. परिणामी कंपनीकडे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनाही पैसे देण्यास विलंब होत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

गुंतवणूकदारांनो पुढे या!

मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनीविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या आर्थिक ठेवींच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दहा तक्रारदारांचा पंधरा लाख रुपयांचा अपहार झाल्याची नोंद केली असली तरी हा घोटाळा त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. गुतंवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे पोलिसांचे आवाहन आहे. कंपनीने दिलेले धनादेश न वटणे ही गुंतवणूकदाराची फसवणूक आहे. तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक आहे. संचालिका वर्षा सत्पाळकर यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरमधून गॅस चोरी

$
0
0

राणेनगरमधून एकाला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरलेल्या सिलिंडरमधील गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा गोरखधंदा गुन्हे शाखा दोनच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी राणेनगर येथील भगवती गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

गॅस सिलिंडर ही जीवनावश्यक वस्तू असली तरी तिचा पुरवठा करणाऱ्यांकडून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा प्रकार गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा दोनचे सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवती गॅस एजन्सीच्या अजय सुधाकर काळे या डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेण्यात आले आहे. ग्राहकांना निर्धारीत वजनापेक्षा कमी वजनाचे सिलिंडर दिले जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. गॅस सिलिंडरची परस्पर चोरी केली जात असल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेचे पोलिस सिलिंडरच्या वाहनांवर पाळत ठेऊन होते. पाथर्डी गावाजवळील

केशवनगर परिसरात भरलेल्या सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असताना काळे आढळून आला. स्टीलच्या पाईपच्या मदतीने कुशलतेने गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती तपासात आढळून आले. पोलिस निरीक्षक बी.एन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ताजणे, देवकिसन गायकवाड, रमेश घडवजे, छगन सोनवणे आदींनी ही कारवाई करून त्याच्याकडून ३२ सिलिंडरच्या टाक्यांसह रिक्षा, स्टीलचा पाईप व तत्सम तीन लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार रिकामे सिलिंडर तर २८ अर्धवट भरलेल्या सिलिंडरचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगीसंदर्भात हरित लवादात शुक्रवारी अपील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशाविरोधात आता बुधवारऐवजी शुक्रवारी (दि. १२) अपील दाखल केले जाणार आहे. महापालिकेने अपील दाखल करण्याचे काम अॅड. रघुनाथ महाबळ यांच्या एजन्सीला दिले असून, महाबळ स्वतः गुरूवारी पालिकेच्या खत प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल केली जाणार आहे.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून हरित लवादाने नाशिकमधील बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून, बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल निर्णय घेतला आहे. महापालिकेने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार केले असून, हरित लवादाचे अॅड.रघुनाथ महाबळ अॅड कंम्पनी यांना वकील पत्र दिले आहे. त्यामुळे अॅड.महाबळ हे गुरूवारी नाशिकमध्ये येवून खत प्रकल्पाची पाहणी करणार आहे. त्यानंतर शुक्रवारी(ता. १२) लवादात अपील दाखल करणार आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळण्याचे चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदल्यांचा दुसरा लॉट पुढील आठवड्यात

$
0
0

कर्मचाऱ्यांना रोखल्यास विभागप्रमुख जबाबदार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ५३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. हा दुसरा टप्पा पुढील आठवड्यात पार पडणार आहे. कर्मचाऱ्यांनी या बदल्याची चांगलीत धास्ती घेतली आहे. पाणीपुरवठा विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना बदलीतून सूट देण्यात आली आहे. जे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकूण एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. आता बदल्यांचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सध्या जळगावातील घरकूल घोटाळ्यातील सुनावणीत व्यस्त आहेत. ते परतल्यानंतर पुढील आठवड्यात या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सद्यस्थितीत पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बदलीतून सूट मिळणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी हजेरी लावली नाही, त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सोबतच विभागप्रमुखांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'टीडीआरप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणाविरोधात मनसेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. शासकीय अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास स्थगिती देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. परंतु, शासनाच्या वकिलांनी हायकोर्टात बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली. हायकोर्टाने शासनाला एक महिन्याची मुदत दिल्याने ही सुनावणी आता ११ मार्चला होणार आहे. त्यामुळे टीडीआर प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला नाही.

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणात नऊ व साडेसात म‌ीटर रुंदीच्या रस्त्यांवर आता टीडीआर देण्यास मनाई करण्यात आली आहे. नाशिकचे बहुतेक रस्ते ६, ७.५० व ९ मीटरच्या आतच आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या विकासाला बसणार आहे. नव्या डीपीत प्लॉटधारकांना अधिक टीडीआर देऊन घरे स्वस्त करण्याचा प्रयत्न होत असतानाच, शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न भंगणार आहे. संबंध‌ित निर्णय हा सर्वसामान्यांना घरापासून वंचित ठेवणारा असून, अधिकारी धार्जिणा आहे. त्यामुळे या निर्णयावर शासनाने तत्काळ फेरविचार करून तो मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका मनसेनेच्या वतीने हायकोर्टात दाखल झाली आहे. बुधवारी न्या. अभय ओक यांच्या पीठासमोर सुनावणी होवून अॅड.सचिन गोरवाडकर यांनी आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर शासनाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याला हंगामातील निच्चांकी भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे बाजार भाव सातत्याने कोसळत आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, लासलगाव बाजार समितित कांद्याला या हंगामातील सरासरी ६४० रूपये इतका निच्चांकी भाव मिळाला आहे.

आठवड्याभरापूर्वी कांद्याला ९०० ते १००० रूपए असे सरासरी भाव होते. त्यामध्ये सातत्याने घसरण होऊन बुधवारी ६४० रूपयांपर्यंत भाव खाली आला. यात अजुनही घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला सरासरी ७०१ रूपये भाव होता. गुजरात, राजस्थान या राज्यातील कांदा मार्केटमध्ये आल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झाल्याने कांद्याचे दर दिवसागणिक कोसळत आहेत. सध्याचा उन्हाळ (गावठी) कांदा मार्केटला येत आहे. या कांद्याची लागवड निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. लागवड झालेल्या कांद्यापैकी फक्त २० टक्केच कांदा मार्केटला आला आहे. त्यामुळे येत्या काळात दर कोसळण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षेसाठी सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आयोजित नाशिक ग्रंथोत्सव अंतर्गत 'स्पर्धा परीक्षेचे विश्व' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संपादक श्रीमंत माने, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी उपस्थित होते. कुशवाह म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना यशस्वी होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. आज स्पर्धा ही केवळ परीक्षेत नसून प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे स्पर्धेला सामारे जाताना जिद्द आणि कष्टासोबत सकारात्मक विचारही महत्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत व्यक्तिमत्वाचा विकासालाही महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे ऋण फेडायचे असतील तर प्रशासन हे क्षेत्र अत्यंत योग्य आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, की परीक्षेचा अभ्यास करतांना आपल्या चुकांचे मूल्यमापन स्वत: करावे. यश मिळाल्यावर त्याचा गर्व न करता जबाबदारीचा विचार युवकांनी करावा. प्रशासनात काम करत असतांना स्वभावात सौम्यता आणणे आवश्यक असते. म्हणून परीक्षेची तयारी करत असतांनाच कमी बोलणे व अधिक ऐकण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे.

३० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री

ग्रंथ प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शासकीय ग्रंथांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शासकीय मुद्रणालायाच्या स्टॉलवर पहिल्याच दिवशी ३० हजार रुपयांची विक्री झाली. यात मराठी शब्दकोश, भाषा, चळवळ साहित्य आदिंचा समावेश होता. त्याचप्रमाणे वैशाली प्रकाशन, ज्योती प्रकाशन व शिल्पा प्रकाशन इत्यादींच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यातील बाल साहित्याला चांगली मागणी असून अनेक शाळांनी आपल्या वाचनालयाला लागणारी पुस्तके या प्रदर्शनातून खरेदी केली. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव पाणीकपातीचा आज सोक्षमोक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील वाढीव पाणीकपातीवरून सध्या महापालिकेतील महाआघाडी आणि भाजपमधील सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता महापौरांनीच पुढाकार घेतला आहे. भाजपच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने लागू केलेल्या छुप्या कपातीचा डाव उघडकीस आल्यानंतर मनसे भाजपाच्या वादात नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून महापौरांनी वाढीव पाणीकपातीचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील चारही आमदार, एक खासदार आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या विषयावर एकदाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी चार दिवसांपासून प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर १० टक्के कपात सुरू केली होती. परंतु सत्ताधाऱ्यांना अंधारात ठेवून ही कपात लागू केल्याने मोठा वाद ओढवल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. गुरूवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल.

शहरात गेल्या तीन महिन्यापासून वाढीव पाणीकपातीवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. महापालिका एकीकडे वाढीव पाणीकपातीला तयार असताना भाजपचे आमदार कपातीला विरोध करत आहेत. परंतु त्याच वेळी छुपी पाणीकपातही नागरिकांवर लादली जात आहे. त्यामुळे या वादात मात्र नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या वाढीव पाणीकपातीचा एकादाचा काय तो सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक दिवसांमध्ये २६ दिवसांचा तुटवडा येत आहे. त्यामुळे वाढीव पाणीकपात अटळ असल्याने त्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आता महापौरांनी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप, खासदार हेमंत गोडसे, उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि सर्व पक्षाच्या गटनेत्यांची एकत्र‌ित बैठक बोलविली आहे. महापौरांच्या दालनात दुपारी चार वाजता ही बैठक होणार असून, त्यात वाढीव पाणीकपातीचा अंतिम फैसला घेतला जाणार आहे.

या बैठकीत उपलब्ध पाण्याची वस्तुस्थिती सादर केली जाणार असून, प्रशासनाचीही भूमिका जाणून घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या पाणी वादातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

जलकुंभनिहाय वाढीव कपात?

संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे जलकुंभ निहाय किंवा विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यावर सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. कपातीच्या दृष्टीकोनातून जलकुंभ निहाय एक दिवस कपात शक्य आहे. त्यामुळे यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images